
आजरा: प्रतिनिधी
आजरा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि महामार्गावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही अतिक्रमणे तातडीने हटवण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक सेवा प्रतिष्ठान संचलित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने नगरपंचायतीला देण्यात आला आहे.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात समितीने खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत:
वाहतुकीस अडथळा: मुख्य बाजारपेठ, पंचायत समिती ते मिनर्व्हा हॉटेल आणि न्यायालय परिसरातील रस्त्यांवर दुकानदारांनी आपले सामान, बोर्ड आणि खुर्च्या ठेवल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.
पार्किंगची समस्या: शहरात नियोजित पार्किंग नसल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. यासाठी प्रशासनाने ‘सम-विषम’ (Odd-Even) तारखेनुसार पार्किंग व्यवस्था लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष: यापूर्वी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ज्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता किंवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता ही अतिक्रमणे त्वरित हटवावीत. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर सर्व नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, बंदोपंत चव्हाण, दिनकर जाधव आणि इतर सदस्य उपस्थित होते.










