युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान
संपादक – रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा
बारामती : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि टंचाईचे संकट निर्माण झाले असतानाच, बारामती तालुक्यातील बाबुर्डी व परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.
इंधन दरवाढीमुळे शेतीचा खर्च आधीच वाढलेला आहे. मशागत, पेरणी, फवारणी आणि मालाची वाहतूक यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
त्यातच अचानक आलेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, भाजीपाला तसेच द्राक्ष आणि डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.या दुहेरी फटक्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कडक उन्हामुळे त्रस्त नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तसेच इंधन दरांवर नियंत्रण ठेवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.


