
कन्नड प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मा. श्री. अविनाश गलांडे यांची, तर उपाध्यक्षपदी मा. श्री. जितेंद्र जैस्वाल यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषद प्रशासनावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे
निवडणुकीचा सविस्तर आढावा:जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अविनाश गलांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल.” तसेच, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनीही सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या विजयानंतर जिल्हयातील विविध स्तरातून नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढून हा विजय साजरा केला.


