उदगीर प्रतिनिधी 🖊️
उदगीर–जळकोट मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निधीतून विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये उदगीर तालुक्यातील पूर्णा–पालम–राणी सावरगाव–खंडाळी–काळेगाव–अहमदपूर–शिरूर ताजबंद–हाळी–उदगीर या राज्य मार्ग क्रमांक २४९ वर लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच याच मार्गावरील हाळी, सुकणी, गंडी पाटी व तोंडारपाटी गावांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, गटार व सीसी रोडसह सुधारणा करण्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
हाळी–डोंगरज–हेर–करडखेल–सय्यदपूर–वळंदी–बोंबळी ते राज्य सीमा या राज्य मार्ग क्रमांक २५२ वरील रस्त्याच्या सुधारणा कामांसाठी १ कोटी २० लाख रुपये देण्यात आले आहेत.
भाकसखेडा ते प्रमुख जिल्हा मार्ग-३८ या मार्गावरील विविध टप्प्यांतील कामांसाठी ९ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच रा.मा. २४५ ते आटोळा–उजळंब–रोहिणा–हेर–कुमठा–तोंडार ते रा.मा. २४९ या मार्गाच्या सुधारणा कामांसाठी ८ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एकूण २५ कोटी रुपयांच्या या निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार असून दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास आ. बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच मतदारसंघातील बहुतांश रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित रस्तेही लवकर पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Pawar तसेच बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री Shivendrasinhraje Bhosale यांचे आ. संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.







