तळा | रायगड
रायगड जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी ३५० वर्षांची प्राचीन परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. तळा तालुक्यातील वारळ येथील महादेवाच्या काठीचा उत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, ग्रामस्थ १५० किलोमीटरचा खडतर प्रवास अनवाणी पायी पूर्ण करत आहेत.
नवाब काळापासून लाभलेला मान
वारळ गावच्या या महादेवाच्या काठीला ऐतिहासिक महत्त्व आहे. तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानाच्या नवाबाकडून या काठीला रीतसर ‘सनद’ प्राप्त झाली होती, हे या परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. या काठीला प्रत्यक्ष महादेवाचे स्वरूप मानले जात असून, जिल्हा हबसान जंजिरा महादेवाची काठी म्हणून ही ओळखली जाते.
१५० किलोमीटरचा अनवाणी प्रवास
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उत्सवाचा प्रारंभ होतो. गावातील अबालवृद्ध मंडळी ही मानाची काठी घेऊन रोहा तालुक्यातील तळाघर येथील पुरातन शिवलिंगाच्या भेटीसाठी रवाना होतात. विशेष म्हणजे, भर उन्हात सुमारे १५० किलोमीटरचा हा प्रवास सर्व भाविक अनवाणी पायाने पूर्ण करतात. पाच दिवसांच्या या प्रवासात ठिकठिकाणी काठीचे पूजन आणि स्वागत केले जाते.
शिव-पार्वती विवाहाचा अपूर्व सोहळा
रोह्यातील तळाघर येथे या काठीचा मुक्काम असतो. या ठिकाणी उमा महेशाच्या स्वयंभू शिवलिंगाची भेट घेतली जाते. रामनवमीच्या रात्री १२ वाजता, शिवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या काठीचा माता पार्वतीसोबत विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
चैत्र पौर्णिमेपर्यंत चालणारा हा उत्सव रायगडच्या लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून, वारळ ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या ही परंपरा अत्यंत निष्ठेने जोपासली आहे.









