शहादा | प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा बायपास आणि खेतिया बायपास रस्त्यांवरील बंद असलेले हायमास्ट दिवे व डिव्हायडरमधील पथदिवे अखेर सुरू करण्यात आले आहेत. उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याने रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला आंतरराज्य महामार्ग आता प्रकाशमान झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरील हायमास्ट लॅम्प आणि पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असताना उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), शहादा नगरपालिका आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती.
त्यांच्या पाठपुराव्यानंतर सर्वप्रथम डोंगरगाव चौफुलीवरील हायमास्ट दिवे सुरू करण्यात आले. त्यानंतर शहर हद्दीतील बायपास रस्त्यावरील सुमारे ४० ते ५० टक्के पथदिवे टाइमरद्वारे सुरू-बंद करण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती नगरपालिकेचे विद्युत विभाग अभियंता योगेश वाडिले यांनी दिली.
या कामामुळे महामार्गावरील अंधार दूर झाला असून वाहनधारक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, शहर हद्दीतील समस्या सोडवल्यानंतर आता लोणखेडा आणि मनरद गावांच्या हद्दीतील बंद पथदिवे सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सौ. माधवी पाटील यांनी सांगितले.










