शहादा, दि. २१ :
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेती आणि मानवी जीवनातील मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाश्यांचे अनन्यसाधारण योगदान स्पष्ट केले. “मधमाश्या केवळ मध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून, परागीभवन प्रक्रियेमुळे शेती उत्पादन वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. के. एस. पाटील आणि प्रा. प्रशांत चंदिले उपस्थित होते. प्रा. के. एस. पाटील यांनी मधमाशी पालनातील आधुनिक तंत्रज्ञान, मधमाश्यांच्या विविध प्रजाती तसेच त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तर प्रा. प्रशांत चंदिले यांनी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वावर निर्माण झालेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत चंदिले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील आणि संचालक मयूरभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


