चंदगड :
सामाजिक वनीकरण विभाग चंदगड आणि चंदगड वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘वन प्रबोधन’ उपक्रमाचे तालुक्यात उत्साहात आयोजन करण्यात आले.
कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी किशोर येळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरोळी, कागणी आणि सुरते येथील शाळांमध्ये चिमणी दिन, जागतिक वन दिन आणि जल दिन साजरे करण्यात आले.
हा कार्यक्रम भावेरी विद्यालय (अमरोळी), व्ही. के. चव्हाण हायस्कूल (कागणी) आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल (सुरते) येथे पार पडला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जल, जंगल आणि जमीन’ हीच काळाची गरज :
या प्रसंगी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे” असे सांगितले. त्यांनी “जिवो जीवस्य जीवनम्” या तत्त्वावर आधारित निसर्गचक्र समजावून सांगत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
तसेच विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शनही करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी प्रेरित झाले.
उपस्थिती व सहभाग :
या कार्यक्रमासाठी वनपाल माणिक खोत, सलीम मुल्ला, वनरक्षक तानाजी भोसले तसेच वन कर्मचारी पांडुरंग खापरे व रविंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ वाटप करण्यात आले.
यापुढेही वने, वन्यजीव संरक्षण, शाश्वत जीवनशैली आणि करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर पर्यावरण जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










