जत : प्रतिनिधी
जत तालुक्यातील अमृतवाडी परिसरात निर्जन शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अमृतवाडी गावच्या हद्दीत ज्योतिबा कोरे यांच्या शेतात काही शेतकऱ्यांना ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
प्राथमिक तपासात महिलेचा गळा दाबून तसेच डोके दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळी अन्नाचे काही पदार्थ, स्प्राईटची बाटली आणि एक बॅग आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









