अकोला जिल्ह्यात झालेल्या अकाली पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे, तर भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक भागांत वीज पडल्याच्या घटनांमुळेही हानी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणांना कामाला लावावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या आहेत.
महावितरण कंपनी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचा त्वरित सर्वे करून पंचनामे करावेत तसेच नागरिकांना उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वीजपुरवठा खंडित झालेल्या भागात तातडीने दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार सावरकर यांनी जिल्ह्यातील अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून, नुकसान भरपाईबाबत प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.







