रिसोड (प्रतिनिधी): पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या, विविध प्रश्न आणि पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, रिसोड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया, रिसोड तालुक्याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनात वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वृत्तपत्रांना १५०% जाहिरात दरवाढ देणे, शासकीय जाहिरातींचे पारदर्शक आणि न्याय्य वाटप करणे, किमान जाहिरात आकार निश्चित करणे, तसेच जाहिरातींची देयके ३० दिवसांच्या आत अदा करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
तसेच सर्व शासकीय जाहिराती माहिती व जनसंपर्क खात्यामार्फतच देण्यात याव्यात, लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी मिळावी, ई-टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात प्रकाशित कराव्यात, शासन निर्णय व बैठकींची माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, प्रलंबित वृत्तपत्र तपासण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, अशा मागण्याही निवेदनात नमूद करण्यात आल्या.
यावेळी पत्रकारांवर वाढत असलेल्या अन्याय आणि हल्ल्यांचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अकोला, नांदेड, श्रीरामपूर, चिपळूण, पनवेल आणि अर्धापूर येथे पत्रकारांवर घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष रुपेश पाटील बाजड, तालुका उपाध्यक्ष तसेच इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.








