नागरिक व शेतकरी हवालदिल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
शिरूर अनंतपाळ | प्रतिनिधी
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आणि वेळीच दुरुस्ती न केल्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चार गावे गेल्या सहा दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मुख्य वीजवाहिनीचा पोल कोसळल्याने ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा तसेच शेतातील विद्युत पंप पूर्णपणे बंद पडले असून नागरिक व शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तळेगाव (बोरी) येथील सरपंच अक्षय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे महावितरणचा मुख्य विद्युत पोल जमिनीवर कोसळला. यामुळे उजेड फिडरवरील थ्री फेस ए.जी. वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या फिडरशी जोडलेल्या उजेड, डोंगरगाव, हलकी आणि तळेगाव (बोरी) या चार गावांचा ग्रामपंचायत पाणीपुरवठा बंद पडला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सध्या पिके आणि फळबागांना पाण्याची अत्यंत गरज असताना विद्युत पंप बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पाणीअभावी पिके वाळण्याच्या स्थितीत आली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरपंच अक्षय पाटील यांनी सांगितले की, पोल कोसळल्याची माहिती त्याच दिवशी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र, सहा दिवस उलटूनही दुरुस्तीसाठी कर्मचारी किंवा अधिकारी फिरकलेले नाहीत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चार गावांतील नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. सहा दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पुढील २४ तासांत वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर चारही गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही सरपंच अक्षय पाटील यांनी दिला.
दरम्यान, संबंधित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
