लोहा | प्रतिनिधी
“स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेला बळ देत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असिस्टंट मॅनेजर तथा लोह्याचे भूमिपुत्र अमोल बालाजी चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम राबवत शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना तब्बल ४५० कचराकुंड्यांचे वाटप केले. तसेच जुन्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सिमेंट बाकडीही उपलब्ध करून देण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणारे अमोल चव्हाण हे “एबीसी” नावाने तालुक्यात परिचित आहेत. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि समाजकार्याची आवड यामुळे त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अमोल चव्हाण हे लोह्याचे माजी सरपंच यशवंतराव चव्हाण यांचे नातू तर राजर्षी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन बी. वाय. चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे कुटुंब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून मोठे बंधू पोस्ट विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
शनिवारी (४ जुलै) बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कचराकुंडी वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाराती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवा नेते नवनाथबापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते केरबाजी बिडवई, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, भीमराव पाटील शिंदे, संभाजी चव्हाण, श्यामराव पवार, गणेश बगाडे, सुधाकर पाटील, तुकाराम दाढेल, पंकज परिहार, सतीश निखाते, विलास कहालेकर, सचिन मुकदम, सदा तेलंग, नारायण यल्लरवाड, मारुती जंगले, अविनाश पवार, सिकंदर शेख, श्रीकांत मंजलवाड, राजेश बोडके, इरबा पवार, शंकर वट्टमवार, मॅनेजर बाहेती यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार तसेच हातगाडी व्यावसायिकांना कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष शरद पवार यांनी अमोल चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शहरातील वृक्षारोपणासाठी लोखंडी जाळ्या उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. उद्घाटक नवनाथबापू चव्हाण यांनीही अमोल यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
याशिवाय शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. जुन्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची बाकडी देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
महेश चव्हाण, साई चव्हाण, प्रशांत शिंदे, संदीप पांचाळ, सूर्यकांत जामगे, मुकुल पवार, रमेश पवार, गजानन दांगटे आणि मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व जपत शहर स्वच्छता मोहिमेला हातभार लावणाऱ्या अमोल चव्हाण यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
