रिसोड (प्रतिनिधी): तालुक्यातील मांडवा व परिसरातील गावांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. बुधवारी (दि. १) सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील उभ्या तसेच काढणीसाठी तयार असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेषतः कांदा, गहू, हरभरा आणि भुईमूग या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मांडवा शिवारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
शेतकरी रामकिसन जनार्धन कायंदे यांचा कांदा पूर्णपणे भुईसपाट झाला असून उद्धव चंद्रभान गरकळ यांचे गहू पीकही जमीनदोस्त झाले आहे. याशिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून उत्पादनाऐवजी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.








