लवकरच ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण होण्याची शक्यता
प्रतिनिधी :
यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा जोमाने शेतीकामात गुंतले आहेत.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण ९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच जवळपास ७० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास हे प्रमाण लवकरच ८० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा जिल्ह्यात ९ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस हे प्रमुख पीक असून सुमारे ४ लाख हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन आहे. आतापर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली असून यंदा हे क्षेत्र ५ लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील दहा दिवसांत कापूस लागवड आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कापसापाठोपाठ सोयाबीन लागवडीला देखील मोठे महत्त्व असून आतापर्यंत दीड लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच सुमारे ७० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मूग आणि उडीद पिकांच्या क्षेत्रात यंदा घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रत्येकी ५ हजार हेक्टरवर मूग व उडीद लागवडीचे नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २३५ हेक्टरवर मूग आणि २१४ हेक्टरवर उडीद लागवड झाली आहे. पेरणीचा कालावधी संपत आल्यामुळे या पिकांचे क्षेत्र मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
ज्वारी पिकासाठी १० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत फक्त १४१ हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे.
जूनने दिला दगा, जुलै ठरला दिलासा
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अनेक भागांत पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या पावसाची परिस्थिती शेतीसाठी अनुकूल आहे. आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास १५ ऑगस्टपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊन यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
