उदगीर | प्रतिनिधी :
उदगीर जिल्हा निर्मितीच्या दीर्घकालीन मागणीसाठी ‘उदगीर जिल्हा निर्मिती कृती समिती’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनासोबत शहरातील सुमारे ६५ विविध सामाजिक संघटनांच्या लेटरहेडवरील समर्थन पत्रे जोडण्यात आली असून, ४०० हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मागणीला व्यापक लोकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर जिल्ह्याचे मुख्यालय उदगीरपासून दूर असल्यामुळे देवरी, जळकोट आणि अहमदपूर या तालुक्यांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी ६५ ते ८५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत असून सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उदगीर हे आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने विकसित होत असलेले शहर असून, स्वतंत्र जिल्हा निर्माण झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २० एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयोजक सुरेश पाटील नेत्रगावकर व मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


