दक्षिण सोलापूर | प्रतिनिधी :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद हद्दीत असलेल्या लोकशक्ती शुगर अँड ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे कारखान्याच्या गोडावूनवरील छत उडून गेले. त्यामुळे साठवून ठेवलेली साखर पावसाच्या पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कार्यालय आणि लेबर कॉलनीवरील पत्रेही उडाल्याने इमारतींचे नुकसान झाले आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून सुरू होण्यास अडचणी येत असलेल्या या कारखान्याने यंदा गळीत हंगामाची सुरुवात केली होती. शेतकरी सभासदांना बिलांचेही वितरण करण्यात आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा कारखाना अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, औराद परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष, गहू, कांदा, ज्वारी, केळी आणि मका पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी लवकरच भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.







