कणकवली (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नगराध्यक्ष Sandesh Parkar यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनियमित पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यांवरील पार्किंग आणि रस्त्यावर वाहने उभी करून विक्री करणाऱ्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
बस स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी क्रीडांगणाजवळ तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीस उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, तसेच अमोल आघम, रविंद्र म्हाडेश्वर यांच्यासह नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, लुकेश कांबळी आणि सत्यजित पारकर उपस्थित होते.








