सिंदखेड राजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील दुसरबीड येथे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांमुळे ग्रामस्थांचा संताप उसळला असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले आंदोलन आता आक्रमक वळणावर पोहोचले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देऊळगाव मही धरणाच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाईन अपूर्ण राहिल्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाइपलाईन टाकताना उकरलेले रस्ते अद्याप दुरुस्त न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि रखडलेली विकासकामे यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.
या आंदोलनाला आता विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी योद्धा कृती समितीचे बालाजी सोसे यांनी उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देत प्रशासनावर टीका केली. तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री नानासाहेब तौर, तालुका उपाध्यक्ष सुरेश बुलकडे आणि अल्पसंख्याक आघाडीचे महामंत्री जावेदभाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रशासनाला इशारा दिला.
“उपोषणावर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर दुसरबीड बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल,” असा कडक इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
उपोषणस्थळी बसलेले ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून त्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, “दुसरबीड बंद”च्या इशाऱ्यामुळे गावातील वातावरण अधिकच तापले असून हे आंदोलन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.






