माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहर व तालुक्यात रेती घाटांवर वाढत्या हाणामारीच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी लांजी रेतीघाट तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा GR महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मराठवाडा प्रमुख समाधान कांबळे यांनी केली आहे.
लांजी रेतीघाट हा सर्वसामान्य व गरीब घरकुलधारकांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आला होता. मात्र काही रेती माफियांमुळे येथे काळाबाजार सुरू असून सामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाळू चोरीचे प्रकार वाढल्याचेही समोर आले आहे.
दि. ५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास २० ते २५ जणांच्या टोळक्याने, हातात शस्त्रे घेऊन, लांजी घाट परिसरातील शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत काही शेतकरी जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या हाणामारीच्या घटना तालुक्यातील इतर घाटांवरही घडत असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वीही रेती घाटांवर दोन गटांमध्ये वाद, हाणामारी तसेच गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला होता, तर एका लोकप्रतिनिधीच्या वाहनालाही धडक देण्याचा प्रकार घडला होता. याशिवाय महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याचे नमूद करण्यात आले.
पैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी जेसीबी व बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या नियमांचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर लांजी रेतीघाट तात्काळ बंद करावा, तसेच संबंधित अट्टल गुन्हेगारांना तडीपार करावे, अशी मागणी समाधान कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.






