विरार | प्रतिनिधी – सारथी महाराष्ट्राचा न्यूज
विरार शहरात बाजारात मुद्रांकित किमतीपेक्षा जास्त दराने स्टॅम्प पेपरची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असून या मनमानी प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीने मुद्रांक प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय स्टॅम्प कायदा १८८२ नुसार विहित किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारणे हा फौजदारी गुन्हा आहे. तरीही काही विक्री केंद्रांवर जादा दर आकारले जात असल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विक्री केंद्रावर “मुद्रांकित किमतीपेक्षा अधिक पैसे घेणे व देणे गुन्हा आहे” असे फलक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी समितीने केली आहे.
तसेच नागरिकांनी जागरूक राहून स्टॅम्प पेपर खरेदी करताना अतिरिक्त पैसे देऊ नयेत आणि फसवणूक झाल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विरार शहर पुरवठा कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



