अक्कलकोट | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असली, तरी तडवळ परिसरातील भीमा नदीकाठच्या भागात शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आळगे, शेगाव, अंकलगी, खानापूर, हिळ्ळी आदी गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
दुसरीकडे, सीना नदीपात्रात अद्याप पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने कोर्सेगाव, कुमठे, चिंचोळी (नजीक), संजवाड आणि बोळकवठा परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाअभावी पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर महावितरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून भीमा नदीकाठील शेतीपंपांसाठी विजेचा पुरवठा वाढवावा, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
