जत : बिळूर येथील श्रीधर निमगोंडा येडगोंड (वय ४०) यांचा जमीन वादातून भरदिवसा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. जत–बिळूर मार्गावरील मल्याळकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीधर येडगोंड यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
येडगोंड कुटुंबामध्ये सुमारे शंभर एकर जमीन तसेच सामाईक विहिरीच्या वापरावरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. यासंदर्भात पोलिस आणि महसूल विभागाकडेही तक्रारी दाखल असल्याचे सांगण्यात येते.
सोमवारी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने ते परतत असताना हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.




