राजापूर – तालुक्यातील आंबेर कोणी गावातील एका महिलेची गोड बोलून फसवणूक करत दागिने व रोख रक्कम लाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेर कोणी येथील संगीता धुमाळ यांना गोड बोलून विश्वासात घेत दागिने व पैसे घेतले गेले. “आज देतो, उद्या देतो” असे सांगत त्यांची वारंवार फसवणूक करण्यात आली. दीर्घकाळ थांबूनही पैसे व दागिने परत न मिळाल्याने अखेर त्यांनी गावपातळीवर तंटामुक्ती समितीकडे धाव घेतली.
मात्र स्थानिक पातळीवर तोडगा न निघाल्याने संबंधित महिलेला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली. या प्रकरणी त्याच गावातील ऋतिका राडये व रवींद्र राडये यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 351 व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नवरा-बायकोने दागिने व पैसे परत देण्याचे कबूल केले असले तरी प्रत्यक्षात अद्याप काहीही परत करण्यात आलेले नाही. त्यामुळे संगीता धुमाळ यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे समोर येत आहे.
न्याय मिळावा यासाठी महिलेने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या महाराष्ट्र दिन रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच महिला आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
