जामखेड – तालुक्यातील बावी गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बावी येथील शेतकरी अभिजीत भास्कर निकम (वय २९) हे ११ एप्रिलच्या रात्री कुटुंबासह घरात झोपले होते. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईने त्यांना उठवून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट व स्वयंपाकघरातील साहित्याची उचकापाचक केली होती.
तपासणी केली असता किचनमधील तांदळाच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये गायब असल्याचे आढळले. चोरीस गेलेल्या मुद्देमालात सुमारे ६२,५०० रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (गंठण, बोरमाळ, कानातील झुबे) तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७२ हजारांचा ऐवज आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गावातील अभिमान मोहन पवार यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे करत आहेत.
