चंदगड:
गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बंद असलेली चंदगड आगाराची चंदगड–पारगड–मुंबई ही एसटी बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे चंदगड तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
पाठपुराव्याला यश
चंदगड-मुंबई ही सेवा बंद असल्याने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक नागरिक प्रकाश पाटकर आणि श्रीकांत कांबळे यांनी सातत्याने परिवहन मंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आजपासून ही सेवा पूर्ववत कार्यान्वित करण्यात आली आहे.
१४ एप्रिलपासून चंदगड-कल्याण सेवाही सुरू होणार
केवळ मुंबईच नव्हे, तर चंदगड-कल्याण या बससेवेचीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, चंदगड-कल्याण ही बससेवा येत्या १४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चंदगड आगाराने दिली आहे.
ग्रामस्थांची आग्रही मागणी
चंदगड तालुक्यातील पारगड-मुंबई आणि चंदगड-कल्याण या बससेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. जनतेच्या गरजा लक्षात घेऊन आणि ग्रामसभांच्या ठरावानुसार या सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या मागणीसाठी बाबूराव हळदणकर, मोहन नाईक, प्रकाश पाटकर, पांडुरंग पाटकर, अंकुश पवार, महादेव पवार, रघुवीर शेलार, श्रीकांत कांबळे, आप्पाजी गावडे यांसह अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने विशेषतः चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे.
- प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज











