आजरा: प्रतिनिधी,
आपल्या अवीट सुरांनी सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. केवळ गाणीच नव्हे, तर नव्या दमाच्या अनेक कलाकारांना त्यांनी दिलेला पाठिंबा संगीत क्षेत्रात सदैव स्मरणात राहील.
नव्या कलाकारांसाठी ठरल्या ‘आधारवड’
आशा भोसले यांनी केवळ स्वतःचे स्थान निर्माण केले नाही, तर अनेक उदयोन्मुख कलाकारांना संधी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याचाच एक प्रत्यय म्हणजे प्रसिद्ध गायक महंमद अजिज यांचा यशस्वी प्रवास. सुरुवातीच्या काळात संगीतकार आर. डी. बर्मन यांनी महंमद अजिज यांना गाण्यासाठी नकार दिला होता. मात्र, आशा दीदींनी अजिज यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना गाणे देण्याची आग्रही विनंती केली. त्यांच्या याच विश्वासामुळे महंमद अजिज यांना संधी मिळाली आणि ते एक यशस्वी गायक म्हणून उदयास आले.
वैविध्यपूर्ण गायकीचा प्रवास
१९३३ मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लावणी, गझल आणि पाश्चात्य धाटणीची गाणी अशा सर्वच प्रकारांत आपला ठसा उमटवला. मराठी, हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांत त्यांनी हजारो गाणी गायली. १९३३ ते २०२६ अशा प्रदीर्घ प्रवासानंतर भारतीय संगीत सृष्टीतील एक लखलखता तारा निघून गेला आहे. ‘पद्मविभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित असलेल्या आशा दीदींच्या जाण्याने कलाविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अर्पण केली आहे











