अंतराळात आधीच एक अढळ असा ध्रुव तारा असताना त्याच्याच कक्षेत फिरत राहून स्वत:ही ध्रुवपद प्राप्त करण्यास हिंमत लागते! खरं तर याच एकमेव ता-यात तिला स्वत:ला विलीन करून घेता आलं असतं…पण हा सोपा मार्ग तिनं निवडला नाही!
थोरली इतरांची आणि पुढे जगाचीही ‘दीदी’ झालेली असताना ‘ताई’ होणंही सोपं नव्हतं. छोट्या भावाची ती दुसरी आई झाली होतीच पण तिच्या नावापुढे जगाने ताई हा शब्द आपसूक उच्चारावा, अशी कामगिरीही तिने करून दाखवली!
आशा भोसले यांच्या एका प्रकट मुलाखतीमध्ये सुधीर गाडगीळ म्हणाले होते,”महाराष्ट्र दोनच भोसल्यांना ओळखतो….छत्रपती शिवाजी महाराज भोसले आणि आशा भोसले!” या विधानात काहीशी अतिशयोक्ती असली तरी यातून आशा भोसले यांनी विपरीत परिस्थितीत स्वत: कोरलेले स्वतंत्र राज्य मात्र निश्चित अधोरेखित होतं.
लता आपल्या वडिलांच्या मंगेशकर आडनावास अखेरपर्यंत जपत राहिल्या आणि आशा यांच्या जीवनात त्यांच्या भोसले या आडनावाने कधी फारकत घेतली नाही. किंबहुना आशा आणि भोसले हे दोन शब्द एकच होऊन गेले होते.
विवाह,संसार यांतील तपशिलावरून व्यक्तीची, विशेषत: स्त्रीचे मूल्यमापन करणा-या आपल्या समाजव्यवस्थेत आशा यांच्या वैय्यक्तिक जीवनाबाबत अनेकवेळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बोलले,लिहिले गेले, पण त्या सगळ्याला आशाताई वाटेवरी काटे वेचित चाललो या विचाराने सामोरे जात राहिल्या. जीवनात अगदीच अनिवार्य नसला तरी आवश्यक असलेला आधार त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न करताना धोकेही पत्करले आणि त्याचे चांगले परिणाम उपभोगले आणि वाईट परिणाम भोगले!
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया….असं म्हणताना त्यांचा आवाज कातर झालाही असेल पण विरह आणि प्रतारणा हे भोग आणि आशाताई अशी सांगड नियतीने घालून दिलेली असावी. हे सर्व पाठी असताना ओठी सुस्वर राखणे किती अवघड असेल….पण हीच किमया साधताना आशा भोसले नेहमीच दिसत राहिल्या! थोरल्या बहिणीसारखं दीर्घायुष्य लाभलेल्या आशाताई आयुष्याचं गाणंही लगबगीनं संपवून जीवनाच्या ध्वनिक्षेपकापासून दूर झाल्या!
मन क्यों बहका रे बह्का आधी रात को? या आशाताईच्या प्रश्नावर बेला महका रे महका असं उत्तर देत लतादीदी समरस होत गायल्या. इतरांच्या कुटुंबातील असलेल्या किंवा नसलेल्या बेबनावाचा सातत्याने शोध घेणा-या समाजाच्या कुजबुजी या दोघींच्या कानांवर गेल्या नसतील असं नाही….पण नावात दोन दोन अक्षरं असलेल्या या दोघींनी एकाचे दोन होतील, अशी विधानं कधी केली नाहीत. तुलना ही दोन समान गोष्टींत होत असते, हे लोक विसरले. त्यामुळे काल्पनिक कथांवर भलताच साज चढवला गेला! खरं तर लोकांनी गाण्याशी मतलब ठेवायला पाहिजे होता….तसं झालं नाही!
लतादीदी यांनी जितके श्वास घेतले तितकेच श्वास आशाताई यांनीही घेतले……पण श्वास घेणारी ही शरीरं वेगवेगळी होती. जिथं जगात कोणतीही गोष्ट ‘हूब हू’ भासू शकते पण असत नाही तसाच या दोघींचा स्वर. इथे तुलना अशक्यप्राय! ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी जुळणी करीत असताना आ म्हणजे आत्मविश्वास आणि शा म्हणजे शानदार असं काहीसं होऊ शकतं!
स्वत: संसारिक सुखाच्या शोधात असताना आशा ताई यांनी गाण्यातले सुख मात्र पुरेपूर घेतले आणि त्याहीपेक्षा श्रोत्यांना दिले. काळजात प्रचंड वेदना असताना त्या देहावर कधीच दिसून आल्या नाहीत. व्यक्तिमत्वाची श्रीमंती कुणाही मात्तबराला शोभेल अशीच ठेवली शेवटपर्यंत. सुन सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है…..या गाण्यातला खट्याळपणा एरव्हीच्या बोलण्यातही कायम ठेवला…..नक्कल केली ती दीदीच्या बोलण्याची….आवाजाची नव्हे…कारण आशा ताई स्वतंत्र ध्रुवतारा होत्या…..त्यांचे रसिकांच्या मनातल्या आभाळातले स्थान कायम राहील, यात शंका नाही. आता लता दीदीना स्वर्गात फुगडी खेळायला आणि केसांत फुले माळून घ्यायला एक हक्काची सवंगडी मिळाली! दीदी…ताई….भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)











