जळकोट तालुका प्रतिनिधी :
कोळनुर येथील शेतकरी मारोती चोले यांच्या घोडीला अतिप्रमाणात प्रवासी वाहतूक केल्यामुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागला. नांदेड ते चंदपूर या प्रवासानंतर गावात परतल्यावर घोडीच्या अंगावर मोठ्या गाठी निर्माण झाल्या तसेच तीव्र कोलीक पेन (पोटदुखी) सुरू झाली होती.
ही अवस्था अत्यंत गंभीर असून योग्य वेळी उपचार न मिळाल्यास घोडीचा मृत्यू होण्याची शक्यता होती. परिस्थितीची गांभीर्य ओळखून मारोती चोले यांनी तातडीने डॉ. कलवले यांच्याशी संपर्क साधला.
डॉ. कलवले यांनी तत्काळ घोडीची तपासणी करून योग्य उपचार सुरू केले. वेळेवर आणि अचूक उपचार मिळाल्यामुळे घोडीची प्रकृती सुधारली असून ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.
या घटनेमुळे वेळेवर पशुवैद्यकीय उपचार किती महत्त्वाचे आहेत, याचे उदाहरण समोर आले आहे. तसेच डॉ. कलवले यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.








