प्रतिनिधी : लाडलेसाब नदाफ
तुळजापूर :तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडवली होती. सुरुवातीला गूढतेचे आवरण असलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर थरारक उलगडा केला आहे. या हत्येमागे प्रेमसंबंध, विश्वासघात आणि पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले असून मयताच्या पत्नीचा सहभाग समोर आल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक बनले आहे.
या तपासात पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे तसेच पोलीस हवालदार महादेव राऊत व जी. बी. वागुलकर यांच्या पथकाने वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाई करत तपासाची दिशा स्पष्ट केली.
घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा, फॉरेन्सिक तपास, श्वान पथकाचा वापर, सीसीटीव्ही फुटेजची छाननी आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर यामुळे गुन्ह्याची साखळी उलगडत गेली. 14 एप्रिल रोजी सायंकाळी “गावात जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडलेले कृष्णा साठे हे मुख्य आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याच्या जाळ्यात अडकले.
आरोपीने मोटरसायकलवरून शेतात नेल्यानंतर “तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस” असे सांगत लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार करून निर्दयीपणे हत्या केली. जीव वाचवण्यासाठी केलेल्या आर्त विनवण्यांकडे दुर्लक्ष करत आरोपीने काही क्षणांतच त्यांचा जीव घेतला.
हत्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवला. त्यानंतर पोत्यात भरून टमटम चालकाच्या मदतीने मृतदेह मंगरूळ-तुळजापूर मार्गावरील पुलाजवळ आणून 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आला. चालकाला धमकावत गप्प बसण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.
तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने “काम ओके झाले” असा संदेश मयताच्या पत्नीला दिल्याचे उघड झाले. यावरून ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित आणि संगनमताने रचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे संशयितांचा घेरा आवळला.
कसून चौकशीनंतर मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे, मुख्य आरोपी शुभम घाटोळे आणि पार्थ देशमुख यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे आणि अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराव्यांच्या आधारे प्रभावी चौकशी करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
मंगरूळसह संपूर्ण तुळजापूर तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. पोलिसांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या कारवाईतून पोलिसांची तपासातील धार, तांत्रिक कौशल्य आणि समन्वय स्पष्टपणे दिसून आला आहे. कितीही चलाखीने गुन्हा केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका आहे.











