बिलोली (सिध्दार्थ कांबळे)
बिलोलीत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे तांदूळ हेच तादुळ पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी भात शिजवून खावे म्हणजे कळेल सर्वसामान्य माणसाला काय त्रास होते ते असा संताप सवाल बिलोली शहरातील नागरिक उपस्थित करताना ऐकावयास मिळत आहे.
बिलोली तालुक्यातील तसेच शहरातील गोरगरीब नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारींना उधाण आले आहे. या प्रकरणी नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट, कधी कधी दगड-माती मिश्रित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. काही ठिकाणी तांदळाला वास येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अनेकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावरच अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट धान्य मिळाल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा अन्नधान्यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो.
यासंदर्भात सौ. गायकवाड यांनी तहसीलदार तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बिलोली तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. धान्य साठवण, वितरण प्रक्रिया आणि गुणवत्तेची पाहणी करून दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी. तसेच पुढील काळात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियमित तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी.
तसेच नागरिकांना दर्जेदार तांदूळ व गहू योग्य प्रमाणात आणि वेळेत मिळावा यासाठी पुरवठा विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेविका सौ. गायकवाड यांनी दिला आहे.










