मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव ते मार्डी या नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
नुकतेच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता रात्रीच्या वेळी अवजड वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर ओल्या वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची क्षमता लक्षात घेऊन बांधकाम केले जाते, परंतु क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने सतत धावत असल्याने रस्ते लवकर खराब होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागांकडून वाळू घाट बंद असल्याचे सांगितले जात असताना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरही कॅमेरे आहेत. तरीही अवैध वाहतूक कॅमेऱ्यात का टिपली जात नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “अवैध वाळू वाहतूक तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्ते खराब होऊन सार्वजनिक नुकसान होईल,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









