अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
चिचोंडी पाटील शिवारात शेतात काम करत असताना दोन महिलांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताराबाई मुरलीधर कोकाटे व त्यांची सून या दोघी शेतात काम करत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी महिलांना मारहाण करून त्यांच्या कानातील व गळ्यातील दागिने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून फरार झाले.
या हल्ल्यात दोन्ही महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर चिचोंडी पाटील येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.







