कन्नड तालुका (प्रतिनिधी) :
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कन्नड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक राजेश्वर लॉन्स येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने पाणीटंचाई व जलजीवन मिशनच्या कामांवर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस आमदार संजनाताई जाधव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितू बाबा जयस्वाल, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी किशोर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाणीटंचाईवर सखोल चर्चा
बैठकीत कन्नड तालुक्यातील आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
जलजीवन मिशन कामांना गती देण्याचे निर्देश
‘जलजीवन मिशन’ अंतर्गत अनेक गावांमध्ये कामे अद्याप अपूर्ण असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. यावर नाराजी व्यक्त करत, सर्व रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच कामांच्या दर्जावर विशेष लक्ष देण्यासही सांगण्यात आले.
विकासकामांचा आढावा व सूचना
पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून गतीमान अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कोणतीही तक्रार प्रलंबित राहू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बैठकीच्या शेवटी सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, तालुक्याच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.








