अकोले (प्रतिनिधी) – संगमनेर व पारनेर तालुक्यात लोककलावंतांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अकोले येथे सुमारे ५०० लोककलावंतांचे आंदोलन होणार आहे. ‘लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या वतीने तहसीलदार, प्रांताधिकारी, डीवायएसपी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात वाजंत्री, तमाशा, आदिवासी नृत्य, जागरण-गोंधळ, पारंपरिक नृत्य अशा विविध कला प्रकारांतील कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होणार असून महिला कलावंतांचाही लक्षणीय सहभाग असणार आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्राची लोककला ही सांस्कृतिक परंपरेची जपणूक करणारी असून ग्रामीण भागातील कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत समाजप्रबोधनही करतात. मात्र, काही ठिकाणी कलावंतांवर होणारे हल्ले, त्रास व अपमानास्पद वागणूक यामुळे ते भयभीत झाले असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कलावंतांना प्रत्येक कार्यक्रमस्थळी पोलीस संरक्षण द्यावे, शासनाच्या योजनांमध्ये ग्रामीण कलावंतांना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कलावंतांसाठी मोफत विमा, प्रवास सवलत, आरोग्य सुविधा, मुलांचे मोफत शिक्षण, तसेच सांस्कृतिक भवन उभारणी यांसारख्या ११ महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच शासनाच्या योजनांमध्ये केवळ निवडक कलावंतांनाच लाभ मिळत असल्याचा आरोप करत, तळागाळातील ग्रामीण कलाकारांना न्याय देण्याची मागणी संघटनेने केली आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करूनही मागण्यांची केवळ तात्पुरती दखल घेतली गेल्याचे सांगत, यावेळीही मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात विविध तमाशा मंडळांचे प्रतिनिधी आणि कलावंत उपस्थित राहणार असून, कलावंतांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.










