लातूर, दि. २३ — मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या देवधरी फाटा ते देहगाव या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर अनियमितता उघड झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत असून आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत प्रतिनिधी अनिकेत बदखल यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित रस्ता देहगावसाठी जीवनवाहिनी मानला जातो. शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका) यासाठी हा एकमेव प्रमुख मार्ग आहे.
मात्र सध्या सुरू असलेल्या बांधकामामध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काम सुरू असताना पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून रस्ता पूर्णपणे खराब झाल्यास वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
- सदर कामाची तात्काळ स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी
- चौकशी पूर्ण होईपर्यंत काम त्वरित थांबविण्यात यावे
- दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
- नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.











