आजरा, प्रतिनिधी:
आजरा साखर कारखान्याकडून सध्या १६ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत सवलतीच्या दरात साखर वितरण सुरू आहे. मात्र या वितरण धोरणात काही सभासद वंचित राहत असल्याचा आरोप करत सर्व सभासदांना सरसकट साखर द्यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय पाटील यांनी केली आहे.
सध्या कारखान्याकडून १५,००० रुपये शेअर्स असलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्ग सभासदांना ५० किलो, १०,००० रुपये शेअर्स असलेल्यांना २५ किलो, तर ७,००० रुपये शेअर्स असलेल्यांना १५ किलो साखर सवलतीच्या दरात दिली जात आहे. तसेच गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर २५ रुपये दराने दिली जात आहे.
परंतु ५,००० ते ६,००० शेअर्स रक्कम असलेल्या अनेक सभासदांना या योजनेतून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात आजरा येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, ५ ते ६ हजार शेअर्स असलेले सुमारे १७,४०८ सभासद, ५ हजारांखालील ६,५८१ सभासद आणि ६ ते ७ हजार शेअर्स असलेले १,३४४ सभासद असे एकूण २५,३३८ सभासद साखर वितरणातून वंचित राहत आहेत. हे सर्व सभासद कारखान्याच्या स्थापनेपासून जोडलेले असून, ऊस पुरवठा आणि मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
“जे सभासद कारखान्याच्या सर्व प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांनाच सवलतीच्या साखरेपासून दूर ठेवणे योग्य नाही. सर्व सभासदांसाठी एकसमान धोरण राबवून किमान ५० किलो साखर सरसकट सवलतीच्या दरात द्यावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तसेच कायदेशीर पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन साखर संचालक, कोल्हापूर तसेच पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनाही देण्यात आले आहे.
यावेळी संजय पाटील, राजेंद्र सावंत, काकासो देसाई, संतोष भाटले (कार्यालय प्रमुख), दयानंद निऊंगरे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते.










