ता. प्रतिनिधी (दि. २०):
मुरूम, बेळंब, कंटेकुर, कोथळी, केसर जवळगा आणि आलूर या गावांतील शेतकरी सध्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्यामुळे विद्युत पंप सुरळीत चालत नाहीत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल्स आणि स्टार्टर जळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत असून त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
सध्या उष्णतेची लाट तीव्र असून तापमान उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाणी मिळणे अत्यावश्यक असताना वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने शेती संकटात सापडली आहे.
या समस्येकडे महावितरण (MSEDCL) विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी वाढत आहे.
दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सर्व गावांतील शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.











