पाथरी (प्रतिनिधी):
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष चक्रधर दादा उगले यांच्या अकाली निधनाने परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. समता, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी लढणारे एक झुंजार व निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथील रहिवासी असलेल्या उगले यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्व उभे केले. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पंचायत समिती सभापती तसेच दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य या जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. तळागाळातील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत समाजकारणात वेगळी छाप पाडली.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा ठसा त्यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. समता, न्याय आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बहुजन समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर मोठा जनसंपर्क निर्माण झाला होता.
दरम्यान, पुणे येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना समता परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिमुरगव्हाण येथील त्यांच्या फार्महाऊसवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. हजारोंच्या जनसमुदायाने अंत्ययात्रेत सहभाग नोंदवत आपल्या लाडक्या नेत्याला अश्रूभिनीत निरोप दिला. सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी घेतलेला निरोप समाजमनाला चटका लावणारा ठरला असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मोठा आप्तपरिवार आहे. समता चळवळीतील त्यांचे कार्य आणि समाजासाठीची त्यांची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.








