नांदेड (प्रतिनिधी):
बिलोली तालुक्यातील मौजे अर्जापुर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयात सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ दरम्यान गंभीर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने संबंधित महाविद्यालयाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.
विद्यापीठाने दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवून परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय कक्षातील कार्यपद्धती तसेच संबंधित नोंदी दि. १७ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्राथमिक तक्रारींनुसार, नियमित कर्मचाऱ्यांऐवजी अनियमित कर्मचाऱ्यांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच गोपनीय कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी नसणे, कर्मचाऱ्यांकडून मोबाईलचा वापर होणे आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
याशिवाय प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती योग्य प्रकारे सीलबंद न करता व नोंदीशिवाय पर्यवेक्षकांकडे पाठविणे, तसेच परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर प्राचार्यांच्या ऐवजी इतर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आढळणे, हे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. दरम्यान, सहकेंद्रप्रमुख गेल्या दहा दिवसांपासून अनुपस्थित असल्याने परीक्षा केंद्रावर नियंत्रण कमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
तक्रारीत परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू असल्याचे, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळल्याचे आणि या सर्व प्रकारांकडे केंद्रप्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचे नमूद आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व संबंधित कागदपत्रे, उपस्थिती नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले असून, अहवालाच्या आधारे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.











