अक्राणी (प्रतिनिधी) – धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द ते वावी, बदला शिरसाणी या मार्गावरील सुमारे १३ किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या सात वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. २०१७-१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आजतागायत हा रस्ता पूर्ण झालेला नाही.
अपूर्ण रस्त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिजरी, बोदला, वावी आदी पाड्यांमधील नागरिकांचे दळणवळण मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दैनंदिन प्रवास, शेतीची कामे आणि अत्यावश्यक सेवा मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन अधिकच धोकादायक ठरतो.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच उर्वरित काम नव्याने सुरू करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सरपंच गणपत ठाकरे यांनीही याबाबत तातडीने चौकशी करून काम पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.









