वर्धा | प्रतिनिधी
देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी १५ ते २० दिवस आधी बुकिंग करावे लागत असूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे.
अशा परिस्थितीत वडगाव परिसरातील एका साकी बारमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा साठा आढळल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गॅस वितरण व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामान्य नागरिकांना गॅससाठी त्रास सहन करावा लागत असताना, एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर कसा साठवला गेला, याबाबत संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ही कोणाची मेहरबानी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गॅस वितरण प्रणाली पारदर्शक आणि सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.











