निगडी (प्रतिनिधी) : निगडी येथील माई सेवा केंद्र गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र बंद असल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून अनेकांचे काम रखडले आहे.
सोमवारी केंद्र सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली. मात्र, कामकाज मर्यादित गतीने सुरू असल्याने नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. “चार-पाच वेळा येऊनही काम होत नाही, त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
सेवा केंद्रात कमी मनुष्यबळामुळे कामकाज मंदावले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. आवश्यक सेवा वेळेत न मिळाल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सेवा केंद्रातील सुविधा सुरळीत कराव्यात, कर्मचारी संख्या वाढवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.











