मंठा, जि. जालना (प्रतिनिधी) : ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून न दिल्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर (दि. १ मे) हे आंदोलन छेडण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निवेदनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, मंठा तालुक्यातील काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचा गंभीर प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाला पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातले जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ आणि भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असताना देखील प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभे राहिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडने प्रशासनास अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलन सध्या शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.








