अहेरी – अहेरी तालुका व दक्षिण गडचिरोली परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळाने सुमारे एक तास तांडव करत जनजीवन विस्कळीत केले. या वादळाचा फटका विशेषतः सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना बसला.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी साई प्रगट दिनानिमित्त धार्मिक विधी व महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे या कार्यक्रमांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला.
साई प्रतिष्ठानचे स्वयंसेवक प्रा. सुनील खंडाळे, जाधव सर, करडे सर व भोंगळे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १००० भक्तांसाठी आयोजन करण्यात आले होते; परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ सुमारे २०० भक्तांनाच महाप्रसादाचा लाभ घेता आला.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमांचीही व्यवस्था कोलमडली. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
तथापि, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. वादळानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून, काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.






