श्रीगोंदा | प्रतिनिधी
ओंकार उद्योग समूहाची सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, या उद्योग समूहाचे तब्बल १७ साखर कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत असून, उद्योग समूहाने आपल्या विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे राज्यासह राज्याबाहेरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ओंकार उद्योग समूहाने यंदाच्या हंगामात सुमारे ७५ लाख टन ऊस गाळप केले असून, येणाऱ्या काळात १ कोटी टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्योग समूहाशी लाखो शेतकरी, ऊस वाहतूकदार, मुकादम, ट्रॅक्टर मालक, चालक व ठेकेदार जोडलेले आहेत.
राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करून योग्य नियोजन व सक्षम प्रशासनाच्या माध्यमातून ते यशस्वीपणे चालविण्यात ओंकार उद्योग समूहाला यश आले आहे. याच विश्वासाच्या बळावर उद्योग समूहाचा टर्नओव्हर ६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, पुढील हंगामात तो ७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली.
कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी १८३० कोटी रुपये अदा केले असून, ऊस वाहतूकदारांना ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
याबाबत ओमराजे बोत्रे पाटील यांनी सांगितले की, “ऊस बिलासंदर्भात शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती हवी असल्यास थेट ओंकार उद्योग समूहाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यात येईल.”
चौकट : अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
ओंकार उद्योग समूहाविषयी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिला.



