धाराशिव प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिलेने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्या सुमारे ७० टक्के भाजल्या होत्या. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला भूविकास बँकेत कर्मचारी होती. बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने त्यांच्या नोकरी आणि थकीत वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. “आम्हाला बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करा आणि आमचे प्रलंबित वेतन द्या,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांवर योग्य वेळी निर्णय न झाल्याने त्या मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, आत्मदहनापूर्वी त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने वेळेत दखल घेतली का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









