शिरूर, दि. ७ मे २०२६ (प्रतिनिधी) – प्रजीमा ५२ अंतर्गत हिवरे – गणेगाव खालसा – रांजणगाव – शिरूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासी, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात गणेगाव खालसा ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह इतर वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याबाबत शाखा अभियंता श्रीपाद बलशेतवार यांनी दूरध्वनीवरून माहिती देताना सांगितले की, “सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम करता आले नाही. मात्र, महिनाभरात निधी उपलब्ध होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाईल.”
ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.











