उमरगा प्रतिनिधी
दि. ०७ मे २०२६
उमरगा तालुक्यातील येणेगुर गावात अवकाळी पावसाने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता आणि नियोजनाच्या दाव्याची पोलखोल केली आहे. स्वच्छतेत ‘नंबर वन’ असल्याचा दावा करणाऱ्या गावात आज झालेल्या पावसामुळे मुख्य गटारी तुंबून घाण पाणी थेट गोरगरिबांच्या घरात शिरले. तसेच जिल्हा परिषद शाळेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
गावातील गटारींची नियमित साफसफाई आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाच्या पहिल्याच फटक्यात गटारींचे पाणी रस्त्यावर आले आणि त्यानंतर थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
येणेगुर गाव हे शासकीय कर वसुली आणि स्वच्छतेच्या पुरस्कारांसाठी ओळखले जात असले, तरी प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वीची तयारी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. “आम्ही कर वेळेवर भरतो, पण पावसाळ्यात घाण पाण्यात राहावे लागत असेल, तर स्वच्छतेच्या पुरस्काराचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावातील तुंबलेल्या गटारींची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी तसेच गावाबाहेर योग्य निचरा होईल असे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
आता या गंभीर समस्येकडे प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते आणि कोणती उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




