उमरगा प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमरगा तालुक्यातील बेळंब येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्तेचा नवा इतिहास घडविला आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. चेतना सहदेव बोडरे हिने ८८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रुती सागर सूर्यवंशी हिने ८६.६० टक्के गुणांसह द्वितीय तर शिवदेव कल्लेश्वर येलगुंदे याने ८५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यंदाच्या परीक्षेत ४० पैकी २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल १२ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, संस्था, शिक्षक तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत घंटे, उपाध्यक्ष दीपक जमादार, सचिव राजेंद्र जमादार, कोषाध्यक्ष जगदीश जमादार तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक श्री. शंकर आसबे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिकांनीही विद्यालयाच्या यशाचे कौतुक करत शिक्षकांच्या मेहनतीचा गौरव केला.
गावकऱ्यांनी सांगितले की, “आसबे सर, कळपे सर, गायकवाड सर, पाटील सर तसेच एस. एन. कांबळे मुरूमकर सर यांनी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी अधिकारी, पोलीस, पत्रकार अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत.”
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.








